Wikipedia

Search results

Wednesday, 8 January 2020

Koli caste

कोरी- एक कोळी जात. यांची वस्ती संयुक्तप्रांत (८,६०,४३४) व वर्‍हाड –मध्यप्रांत (३९,६२८) यांतून आहे. एकंदर लो.सं. (१९११) ९,१८,८२० आहे. कौलिक म्हणजे परंपरात या संस्कृत शब्दावरूनही कोळी हा शब्द बनलेला असावा. अशी एक दंतकथा आहे की, कबीर गंगास्नानास जात असताना त्याला वाटेत एक कुमारी आढळल्यामुळे `पुत्रवती भव’ असा त्यानें तिला आशीर्वाद दिला. परंतु ती कुमारी असल्यामुळे कबिराची वाणी निराळ्याच रीतीने खरी झाली. त्या कुमारीच्या हातावर एक फोड झाला व त्यांतून एक पुत्र निर्माण झाला. तिने त्यास गंगाकिनारी ठेविले व तेथील एका कोळ्याने त्या मुलास मोठे केलें. हा कोळी मुलगाच कोरी जातीचा मूळ पुरुष होय, असें ते मानतात. कारण तो `कोरी’पासून झालेला होता. या कथेसंबंधी एक दोहराहि या लोकांत प्रसिद्ध आहे. खानेसुमारीवरून कोरी लोकांची मोठी संख्या असल्याचें दिसून येते. अहारवार, बैस, भडौरिय, भाइनहार, बंकार, धामन, जइसवार, जाटवा, ज्युरीया, करीरवन्सी, कैथिया, कामारिया, कनौजिया, कोरचामरा, कुष्टा, माहुरे, परसूतिया, साकरवार, संखवार इत्यादि मुख्य पोटजाती आहेत. यांशिवाय आणखी बर्‍याच पोटजती आहेत. खानेसुमारीत त्यांच्या जातिनामांची संख्या १०४० पेक्षां कमी नाही.

चालीरीती व एकंदर वागणूक या बाबतीत कोरी लोक चामारा (चांभार)च्या दर्जाचेच आहेत. हमिरपूर येथे वधू गृहप्रवेशाचा एक निराळाच प्रकार आढळून येतो. घरांतील वृद्ध मनुष्य कांही पोळ्या तयार करतो व डुक्करासह त्यांचा नैवेद्य बालताई देवीस दाखवितो. नंतर `निहारन’ समारंभ झाल्यावर तीन पोळ्या वधूवरांनी पायाखाली तुडवून गृहप्रवेश करावयाचा असतो. हमिरपूर येथे लग्नाचे दलाल असतात व त्यांनां एखादी धोतरजोडी बक्षीस देण्यात येते. बालविवाह रूढ असून वराचे लग्न त्याच्या बहिणीच्या नवर्‍याने जुळवून आणावयाचे असते. हा जुन्या मातृकन्यापरंपरेचा अवशेष असावा. काराओ-विधीने लग्न झालेल्या स्त्रीला राजरोस आपल्या नवर्‍याच्या घरी जातां येत नाही. काराओ विधीने विधवेला पुनर्विवाह करता येत नाही. ब्राह्मण, रजपूत, वाणी, कायस्थ, अहीर, गदारिया, कच्छी, कहार, भूर्जी, बारहाइ, खाटी व कूर्मी इत्यादिकांनां कोरी लोक आपल्या जातीत घेतात; परंतु चांभार, तेली, धोबी, बारी, धानुक इत्यादिकांनां मनाई आहे. एटावा येथे विधवेला नवर्‍याच्या ज्येष्ठ अगर कनिष्ठ बंधुशी लग्नाची मुभा असते असे म्हणतात. अखिल कोरी समाज हिंदु आहे. फैजाबाद येथील कोरी रामदासी अथवा शिवनारायणी पंथाचे असून बिजनोर येथील कोरी लोक कबीरपंथाचे आहेत. हीच स्थिती हमिरपूर येथे आढळून येते. त्या ठिकाणी सर्व धार्मिक विधी दुहितेच्या नवर्‍याने करावयाचे असतात. मातृकन्यापरंपरेचे हे दुसरें उदाहरण होय. पश्चिम प्रांतांतील कोरी, झाहिर पीरदेवाची व अम्रोहा आणि जालेसर येथील मियाणाची उपासना करितात. पूर्वेकडील कोरी पंचावन पीर व सीतला माता यांना भजतात. कोरी लोकांचा सामाजिक दर्जा फार हलका आहे. मिर्झापूरचे ब्राह्मण, काहार-कोर्‍यांच्या हातचे पाणी पितात, पण चामार (चांभार) कोर्‍यांचे पाणी वर्ज समजतात. धोबी चामार हे कमारकोर्‍यांच्या हातची कच्ची व पक्की रसोई खातात व कालवारखेरीज सर्व वैश्यांच्या हातचीहि पक्की रसोई खातात. कोर्‍यांचा धंदा म्हणजे जाडीभरडी खादी विणणे हाच होय. काही कोरी नोकरी करतात व काही जमिनीचे मालकहि असतात. कुष्ट अथवा कोष्टी ही कोर्‍यांची एक पोटजात दक्षिणेत विणकर्‍यांचा धंदा करून उपजीविका करीत आहे. मध्यप्रांतात यांची वस्ती सागर, दमो, जबलपूर वगैरे जिल्ह्यांत आहे. यांस कोणी कोल लोकांची शाखा असे म्हणतात. (क्रूक; रसेल व हिरालाल; सेन्सस रि.)
2)
कोळीजात:- हिंदुस्थानांत कोळी जातीची एकंदर लो.सं. ३१।। लाख आहे. मुंबई इलाख्यांत ती २२ लाखांच्या वर असून त्यांची वस्ती दक्षिण हिंदुस्थान, गुजराथ, ठाणे, कुलाबा, वर्‍हाड, खानदेश इकडे आहे. यांचा दर्जा कुणब्यांहून खालच्या प्रतीचा आहे. (रे. जे. विल्सन- फ्रयाग्मेंटस् १८७६). महाराष्ट्रांत साधे कोळी व डोंगरी कोळी असे दोन प्रमुख भेद असून पुन्हा त्यांत सोनकोळी, महादेवकोळी वगैरे आणखी पोटभेद आहेत. त्यांची त्रोटक माहिती त्यांच्या वस्तीच्या व इतर माहितीसह खाली दिली आहे.

कोळी हे बारा बलुत्यांपैकी असून बलुत्याचा हक्क त्यांना मिळतो. हे उच्च वर्गांतील लोकांकडे पाणी भरतात व मासे पकडून त्यावर उदरनिर्वाह करतात. कोणी कोणी नदीवरच होडय़ांतून अगर नदीकाठी झोपडय़ांतून राहतात. डोंगरीकोळी हे मावळ (सह्याद्रींतील) व कोंकण इकडे आहेत. हे जंगलांतील कंदमुळे व शिकार यांवर उवजीविका करतात; काही शेतीही करतात. त्यामुळे हे इतर हिंदू शेतकरी जातीत मिसळले गेले आहेत. डोंगरी कोळ्यांत धुडिया, चौधरी, वारली, कातकरी, दुबळा, ठाकूर या पोटजाती आहेत असे रे. विल्सन म्हणतो. यांच्याचपैकी ढोरकोळी म्हणून एक पोटजात आहे, तिला (ती मेलेल्या जनावरांचे मांस खात असल्यामुळे) सर्वांत हलक्या दर्जाची मानतात. महादेव व मल्हार कोळ्यांचे मराठय़ांशी साम्य आढळतें. काश्मीर प्रांतांत ही जात थोडी असून ती शेतकी करते व तिकडे तिला कोहली असे नाव आहे. ते आपल्याला पूर्वीचे क्षत्रिय समजतात. नर्मदेच्या उत्तर प्रांतीहि यांची बरीच वस्ती आहे.

संस्कृतांत कोल शब्द येतो; तोच या कोळी जातीचा निदर्शक असावा असे विद्वानांचे म्हणणे आहे. कोलापुर, कोलवन वगैरे प्रांत हा यांचा मूळ देश असून हे येथीलच मूळचे (अनार्य) रहिवासी असावे असा काहींचा तर्क आहे. (वि. ज्ञा. विस्तार पु. २३. पृ. ११०).

कोळ्यांतहि कदम, पोवार, क्षीरसागर, दळवी, गायकवाड, शिरके, जाधव, भोइटे, शेलार वगैरे मराठय़ांप्रमाणेच आडनावे आहेत. मराठय़ांमध्ये व कोळ्यांमध्ये पूर्वी शरीरसंबंध होत असत अशी दंतकथा कोळ्यांत प्रचलित आहे. कोकणांतील जे कोळी शेतकी करतात त्यांना ‘आगरी कोळी’ व जे मळा लावितात त्यांना ‘माळी कोळी’ म्हणतात. (वि. ज्ञा. वि. पु. २१ अं. २)

वर्‍हाडांतील कोळी म्हणतात की, “मासे पकडून अगर विकून निर्वाह करणारी कोळ्यांची एक पोटजात आहे; तिचा इतर पोटजातीशी अन्नोदकाचा संबंध नाही; तसेंच पोषाख वगैरेंत कोळ्यांच्या इतर पोटजातींशीही तिचे साम्य नाही. वर्‍हाड, मध्यप्रांत व महाराष्ट्रांत मासे धरून व ते विकून निर्वाह करणारी भोई या नावाची एक स्वतंत्र जात आहे. तिच्यांतहि अनेक पोटजाती आहेत. ही भोई जात सर्वच बाबतींतही मागासलेले आहे. कोळी जातीचा भोई जातींशी काहीं संबंध नाही.” (रा.उ.के. जाधव- एलिचपूर यांच्याकडून आलेल्या माहितीवरून) महाराष्ट्रांतील मराठी भाषा बोलणार्‍या कोळ्यांची लो. सं. ३ लाख आहे. यांच्यांतील मुख्य जाती पुढील भागांत राहतात. मराठो कोळी- वस्ती निजाम इलाख्यांतील मराठवाडा व मुंबई इलाख्यांतील सह्याद्रीच्या पूर्वेकडीस प्रांतांत रहाणारी. यांच्यांत वतनदार देशमुखादि लोक आहेत पण फार थोडे. धंदे:- शेती, पाणी भरणे व नावा हाकणे. मराठेखार कोळी- वस्ती वर्‍हाडांतील पूर्णा नदीकाठचा प्रदेश व खानदेश. यांच्यात बरेचसे वतनदार असून ते शेती व इंग्रजी होण्यापूर्वी मीठ पिकविण्याचा धंदा करीत. त्यावरूनच त्यांना खार हे नाव मिळाले असावे. सोनकोळी- वस्ती उत्तर व दक्षिण कोकणात असून यांचा मुख्य धंदा मासे मारणे व जहाजें चालविणे हा होय. महादेव, मराठे व मराठेखार या पोटजातींत अन्नोदक व्यवहार आहे. सर्व पोटजातींचे विवाहादि संस्कार ब्राह्मणभिक्षुकच करतात. जातीसंबंधाचे काही नियम मोडल्यास त्यांचा निकाल पंचायतीमार्फत होतो. परंतु धार्मिक नियम मोडल्यास त्यांचा निकाल ब्राह्मणभिक्षुक शास्त्राधारें करतात. सर्व पोटजातींच्या सामान्य व गावपंचायती आहेत. महादेव, साने व मल्हार या पोटभेदांत सामान्य पंचायतीचा हक्क वंशपरंपरागत चालतो. पंचांना पाटील, मेहत्तर किंवा महाजन म्हणतात. काही पोटजातींत निवाडय़ाची देवळे किंवा मठासारखी स्थळे असून त्यांना इनाम जमिनी मिळालेल्या आहेत. सर्व पोटजातींत पुनर्विवाहाची चाल असून राखेपासून झालेल्या राततीची जात कोळीच धरली जाते; मात्र त्या जातीस लहानताटे, अक्रामासे किंवा कडु म्हणतात. या कोळी जातीचा स्वतंत्र इतिहास नाही. मालुतारण ग्रंथात म्हटले आहे की, शालिवाहन राजाच्या एका कोळी सरदाराने पंढरपूर हे वसविले. त्याच सरदाराचे वंशज तेव्हापासून आतापर्यंत पंधरपूरच्या पुंडलिक व मल्लिकार्जुन या देवांची पूजा करून तेथील उत्पन्नही घेतात. या जातीचा एक प्राचीन मठ ‘ऋषिमठ’ नावाचा वर्‍हाडांत दर्यापूर तालुक्यांत सामदे या गावी आहे. मराठी राज्यांत मावळे लोकांच्या फौजेंत व आरमारांतही कोळी लोक पुष्कळ होते. कोळ्यांची बहुतेक कुलदैवतें देवी, महादेव व मल्हारीमार्तंड ही आहेत. जातींतील सुज्ञ लोकांचा आपण क्षत्रिय आहो असा समज आहे.” (उ. के. जाधव यांनी दिलेली माहिती).

वर्‍हाडांतील कोळी हे भील लोकांचे संबंधी असावेत असे मे. रसेल व हिरालाल म्हणतात. हे लोक पूर्वी डोंगरांतील मार्ग़ांचे रक्षण करीत असत. चौदाव्या शतकांत मुसुलमानांच्या त्रासामुळे इकडे आलेल्या बर्‍याच रजपुतांनी यांच्या मुली केल्या. त्यांची संतती आपल्यास राजपूत म्हणविते. मध्यप्रांतांत यांच्या जाती आहेत त्या सूर्यवंशी, मल्हार, भिलावाफोड व शिंगगाडे या होत. बर्‍हाणपूर भागांत कांही कोळी मुसुलमान झालेले आहेत. यांच्या लग्नांत एका पाटय़ाभोंवती वधुवरांनी सात प्रदक्षिणा घातल्या की लग्न पुरे होते. वाङ्निश्चयाच्या दिवशी वराच्या बापास वधूगृहीं उंबरठय़ांत ठेंच लागणे हा एक शुभमुहूर्त मानितात. बायकोच्या व्यभिचारामुळे काडी मोडता येते; नंतर तिने जर आपल्या जाराबरोबर पाट लाविला तर जारानें १०० रु. दंड जातीस दिल्याखेरीज त्या दोघांना जातींत घेत नाहींत. विवाहित स्त्रीने व्यभिचार केल्यास तिला सवासन म्हणतात. नेमाडांतील कोळ्यांची कुलदेवता इच्छापुरची देवी असून त्या ठिकाणी पूर्वी गळ घेत असत. यांच्यांत प्रेतें पुरतात. हे लोक गोमांस सोडून वाटेल ते खातात व दारुहि पितात (कास्ट्स्ट्राइब्ज. सी. पी.- रसेल व हिरालाल).

नाशिक जिल्ह्यांत मल्हार, ढोर व राज या तीन जाती आहेत. यांचा निर्वाह बहुतेक शेतीवर असून हा वर्ग खाऊन पिऊन सुखी आहे. जात्या चपळ व धाडसी असल्याने यांच्यात चौर्यकर्माची लालसा एके काळी बरीच वाढली होती. इ.स. १८४५ साली राघोजी भांगर्‍या याने या जिल्ह्यांत सर्वत्र लुटालूट करून धुमाकूळ माजविला होता. त्याने मारवाडय़ांना लुटण्याचा व त्यांची नाके कापण्याचा सपाटा लाविला होता. शेवटी त्याला पंढरपुरास पकडून पुढे फाशी दिले. इकडील कोळ्यांचा लग्नविधी व आचार कुणब्यांप्रमाणेच असतो. मुलीला माहेरकडून मिळालेले दागिने हे हक्काचे व नवर्‍याकडून मिळालेले हे उसने असतात अशी एक विचित्र समजूत यांच्यात आहे. (नाशिक ग्याझे.).

ठाणे जिल्ह्यांत मुख्यत: महादेव कोळी हे प्रमुख आहेत. जिल्ह्यांतील जव्हार संस्थान महादेव कोळ्यांचेच आहे. मुबारक खिलजीने इ.स. १३४७ त येथील कोळ्यांस संस्थानिक पद कबूल केले असे म्हणतात. परंतु कालदृष्टय़ा हे संशयास्पद वाटते. यांची इकडील सत्ता पोर्तुगीज या भागांत येईपर्यंत अबाधित होती व फिरंगी आले तरी त्यांना या जव्हारकरांचे थोडेफार भय असे. अठराव्या शतकांत मात्र पेशव्यांनी जव्हारकरांचा बराचसा मुलुख घेतला. आगरी व सोन याखेरीज आणीक बारा (कोळशांच्या) पोटजाती या जिल्ह्यांत आहेत. त्या पुढीलप्रमाणे (१) बांड (२) चांची (३) ढोर किंवा टोकरे (४) डोंगरी (५) खार (६) महादेव (७) मल्हारी किंवा चुंबळी ऊर्फ कुनम अथवा पानभरी (८) मारवी (९) डोंगरी किंवा मेटा (१०) राज अथवा थेन (११) सोलेसी ऊर्फ बाळा किंवा काष्टी, लाललंगुटी (१२) ठाणकर. यांची थोडी माहिती पुढे दिली आहे. बांड:- धंदा शेती किंवा मजुरी. हे लोक चोरीही करतात. चांची:- हे काठेवाडांतील मूळचे असावेत; व्यवसाय शेतची व मजुरी. हे मेहनती असून यांचे कुलदैवत ठाकुरजी व महालक्ष्मी होय. ढोर:- हे गोमांस खातात म्हणून यांना ढोर म्हणतात. बांबू तोडण्याच्या धंद्यावरून यांना टोकरे नाव मिळाले. हे पक्के दरवडेखोर आहेत. यांचे लग्न ढोर कातकर्‍याप्रमाणे ज्ञातींतील माणसे लावितात. डोंगरी:- उपजीविका शेतकी व मजुरी; हे इतर पोटजातींच्या हातचें पाणी पीत नाहीत. महादेव:- निजामच्या राज्याच्या पश्चिम सरहद्दीवरील महादेव व थालाघाट हें यांचे मूलस्थान असावें. तेथून ते पुण्याकडे येऊन तिकडून कोंकणांत पश्चिम व उत्तर भागाकडे चौदाव्या शतकाते सुमारास पसरले. पापेरा नांवाचा त्यांचा एक नाईक एका सिद्धाच्या आज्ञेनें जव्हारास येऊन तेथील वारली राजाकडे येऊन तेथील वारली राजावर स्वामित्व मिळवून जव्हार संस्थानचा मूळपुरुष झाला. याने गंबीरगड घेऊन दिल्लीवर मोंगलांकडून या भागांतील बावीस किल्ले व त्याखालील प्रांत जहागीर मिळविला अशी एक दंतकथा आहे. या जातींत एकंदर २४ घराणीं असून त्यांच्या शाखा दोनशेंवर आहेत. यांच्यांत देशमुख जहागीरदार पाटील वगैरे आहेत. पूर्वी इकडे मराठे व कोळी यांच्यात लग्नें लागत. हे लोक काटक व मजबूत असून यांच्या स्त्रिया नाजूक व रेखीव अवयवांच्या आणि कुणबिणीपेक्षाही सुरेख असतात. हे पोषाखाचे फार शोकी आहेत. यांचा मुख्य धंदा व शेतीचा व शिपायीगरीचा आहे. हे हुषार, चाणाक्ष तीव्र स्मरण शक्तीचे असून बोलण्यात म्हणी व अलंकार वापरतात. हे स्वातंत्र्यप्रिय असल्याने त्यासाठी धडपडहि करतात. पूर्वी मराठी राज्यांत यांच्यातील स्त्रियांनीही लष्करी बाणा पाळल्याचे ऐकण्यांत आहे. इ.स. १८३१ मध्ये लक्ष्मी घाटगे या स्त्रीने रामोशांशी पुष्कळ दिवस टक्कर दिली होती. पेशवाईपूर्वी हे लिंगायतधर्मी असून पेशवाईंत हे सनातनधर्मीय झाले. यांचे कुलदैवत खंडोबा, भैरोबा व भवानी आहे. यांचा जादुमंत्रटोणा यांवर भरवसा आहे. बायकोने नवरा सोडून परजातींत प्रवेश केल्यास तिची उत्तर क्रिया करून मग नवरा दुसरे लग्न करतो. आकस्मिक मेलेल्यास किंवा रोगानें फार दिवस खितपत पडून मेलेल्यासच जाळतात. यांच्यातील पंचायतींस गोतरणी म्हणत. त्याचे सहा सभासद असून मुख्याला रगतवान, उपाध्यक्षाला मेतल व इतरांना साबला, ढाल्या, हाडक्या व मडक्या अशी नावे असत. मल्हारी:- हे सर्व कोळी जातींत उच्च व निर्मळ समजले जातात. यांच्यांत जाधव, पोवार, गायकर, केरव वगैरे आडनावें आहेत. गावकर्‍याना व प्रवाशांना हे पाणी पुरवितात म्हणून यांना पानभरी, डोक्यांवर पाण्याची घागर वाहताना चुंबळ घेतात म्हणून चुंबळी व कुणब्यांशी क्वचित रोटीव्यवहार करतात म्हणून कुनम अशी दुसरी नावे आहेत. हे शेतीही करतात. मारवी:- पूर्वी हे पालखी, मेणे वगैरे वाहत असत; सध्या हे मजुरी व पाणी भरण्याचे काम करतात. मेटा:- यांना डोंगरीही म्हणतात. मराठी राज्यांत हे खलाशी व नाविक होते. स. १८३६ पर्यंत सुद्धा यांच्यापैकी सधन लोक मलबार किनार्‍याशी व्यापार करीत होते. हे फार दारूबाज आहेत. राजा:- पूर्वी हे कोळीराजाच्या पदरी नौकर असल्याने व यांच्याशी त्याचा बेटीव्यवहार होत असल्याने यांना राज हे नाव मिळाले. पूर्वी यांच्या जातीचा मुख्य नाशिक जिल्ह्यांतील वाघदरा गावी राहात असून त्यास सरनाईक म्हणत असत. सोळेसी:- धंदा मजुरी व शेतकी. ठाणकर:- हे फिरंग्याच्या कारकीर्दीत वाटले गेले. स. १८२०-२१ साली पटकीची साथ आली असता, त्यावेळी यांच्यापैकी बरेचजण पुन्हा हिंदू होऊन खंडोबा व भवानीची पूजा करू लागले आणि विवाहविधि वगैरे ब्राह्मणांकडून करवूं लागले. याप्रमाणे ठाणे जिल्ह्यांतील पोटजाती आहेत. यांची एकंदर लो. सं. ८ हजार असून हे कोळी दिसण्यात सर्वसाधारण कुणब्यांप्रमाणे असतात. काही (विशेषत: स्त्रिया) कुणब्यांपेक्षा गौर असतात. हे मराठी साम्राज्यांत नावाजलेले दर्यावर्दी असून मराठी आरमारांत नौकर असत. यांच्यात देवकेंही आहेत व लग्ने देवकांकडून लावितात. यांच्या जातीचा मुख्य अलिबागेस राहतो, त्यास वाघपाटील असे नाव आहे. (ठाणे ग्याझे).

गुजराथेंत कोळ्यांच्या जाती व पोटजाती अनेक असल्याने त्यांचे वर्गीकरण करणे कठीण आहे. उच्चवर्गांत पाटाची चाल नसून ते आपल्या मुली रजपुतांना देतात. पागी, कोतवाल, पाटणवाडिया अशा हलक्या कुळांत ते शरीरसंबंध करीत नाहीत. धाराळ, तालब्द इ. सर्वसाधारण कुळ्या यांच्यांत रूढ असून सर्वसाधारण चालीरीती स्थानिक हिंदूंप्रमाणेच आहेत. पालनपूर, महिकांठा, पंचमहाल व कच्छ या भागांतील लोकांत कुळें आहेत. मात्र लग्ने कुळांवरून किंवा आडनांवांवरून होतात हे नक्की समजत नाही. इकडे अनेक पोटजाती असून एका पोटजातींतील लोक दुसर्‍यातील लोकांशी लग्ने लावीत नाहीत. खांत, बारीआ, पटेलिया या पोटजाती पंचमहालांत व पाटणवाडिया धाराळ या सुरत व भडोचकडे आहेत. या लोकांमध्ये भिल्ल व रजपूत यांचा भरणा विशेष असून पुष्कळ जातींच्या मिश्रणाने ही जात बनली असावी. काठेवाडांत खांत कोळ्यांची एक मोठी पंचायत असून, अहमदाबाद जिल्ह्यांत नालकंठ येथे ताळबद व पटेलिया यांच्या पंचायती आहेत आणि कापडबंज व थराड येथेही काही पोटजातींच्या पंचायती आहेत. (सेन्सस ऑफ इंडिया, बॉम्बे व्हॉ. ७).

कच्छ ते दमण या समुद्रकिनार्‍यावरील कोळ्यांना मच्छी म्हणतात. आगगाडीचे पूल बांधण्याच्या कामी यांचा फार उपयोग होतो. श्रावण वद्य नवमी रोजी ते गुगोपीर याचा उत्सव करून त्या दिवसांत छडी नोत्र (नवमी) असे म्हणतात.  गुजराथेंत एकंदर लोकसंख्येशी कोळ्यांचे प्रमाण शेंकडा २३ प्रमाणे पडतें. भिल्ल व रजपूत या दोघांत आणि इकडील कोळ्यांत फारसा भेद दिसून येत नाही. काहींचें म्हणणें कोळी व मेर हे एकच होत. रेवाकांठय़ाकडे बामनीआ, बारिया वगैरे २१ पोटजाती आहेत. इकडे चुंव्वाळिया म्हणून जी एक जात आहे ती गौरवर्णी असून ती मूळची चाळीस खेडय़ांच्या एका प्रदेशांतील रहिवासी असल्याने तिला चुंव्वाळिया नांव मिळाले; तिच्यातही २१ पोटजाती आहेत. हे लोक लुटारू म्हणून पेशवाईपासून प्रसिद्ध आहेत. ते लोकांशी फटकून वागतात. पूर्वी यांच्यांत एक प्रकारची शिस्त असे; ते पुढार्‍याला ठाकोरदास म्हणत. आसपासच्या खेडेगांवांतून धमकीनें हे पैसा गोळा करीत व गावानें न दिला तर दरवडा घालीत. या प्रसंगी घोडे खिंकाळून लोक सावध होऊ नयेत म्हणून हे घोडय़ा(माद्या) वापरीत; तोडय़ाची बंदूक, तलवार व भाला ही यांची शस्त्र होती; पुढारी अंगांत चिलखतेंही घालीत. हे आपल्या वस्तीभोवती निवडुंगाचें दाट कुंपण घालीत व क्वचित् तटबंदीही करीत. हल्ली यांचा लुटारूपणा कमी झाला आहे. खाट ही एक मोठी पोटजात काठेवाड व रेवाकांठा इकडे आहे. हे साधारण रानटी असून दर्‍याखोर्‍यातून रहातात. कंथी (कच्छी) या टॉलेमीने योजलेल्या शब्दांचें व खाटचें थोडेसें साम्य दिसते. मात्र ते स्वत:स भाटी लोकांचें वंशज म्हणवितात. त्यांच्या नायकास मेर म्हणतात. क्षत्रिय पुरुष व भिल्ल स्त्री यांपासून खाट जात झाली असें म्हणतात. यांचा एक पुढारी धांधलखाट याने धंधुकाप्रांत जिंकून धांदलपूर वसविलें व दुसरा एक पुढारी पाटलखाट याने पेटलाद प्रांत जिंकला असे सांगतात. महंमद तघलखाच्या वेळी यांच्यातील जेल किंवा जयसिंग या नायकाने मुसलमानांना जुनागड घेण्याच्या कामी मदत केली व त्याबद्दल त्याला गिरनार पर्वतावरील प्रदेश व विलख चोबीसी म्हणून चोवीसी खेडी मिळाली. हे लोक महंमूद बेगडय़ानें गुजराथ घेईपर्यंत गिरनारकडेच राहात होते. यांच्यांतील विधवा आपल्या धाकटय़ा दिराशी लग्न लावते. पाटणवाडिया ही जात अनहिलपाटणप्रांतांत राहते; तिला कोहोड (खेडवळ) किंवा कुर्‍हाडे असेंही दुसरे नांव आहे. मराठी राज्यांत हे सैन्यांत शिरत असत. तत्पूर्वी ते लुटालूट करीत. दिल्लीच्या हुमायून बादशहाचें सामान सुमान यांनी खंबायतजवळ एकदा लुटले होते. अठराव्या शतकाच्या आरंभी ते दर्यावर्दीपणा करीत करीत थेट इराणच्या किनार्‍यापर्यंत जात असत. बहुधा मराठी साम्राज्य नाहीसें झाल्यावर हे लोक लष्करांतून कमी झाल्यामुळे हल्ली दुसर्‍या धंद्याऐवजी हे लुटालुटीकडे वळले असावेत. खेडा जिल्ह्यांत तर १८३२ मध्ये यांनी दंगा आरंभला असता सरकारकडून पुरा बंदोबस्त झाला नाही. पुढे १८५७ साली मात्र त्यांना नि:शस्त्र केल्यामुळे यांची दंग्याची प्रवृत्ती पुष्कळ कमी झाली. तलबदा ही एक कोळ्यांची जात असून ती इकडील भागांत श्रेष्ठ आहे. तलबदा म्हणजे तलपति (जमीनदार) होय. यांना धाराळें (खड्गधारी) असेंही म्हणतात. ते आपल्यास धारच्या परमार रजपुतांचें वंशज म्हणवितात. धार नगरीच्या राजानें गुजराथेंतील भिल्ल राजकन्येशी लग्न लाविले व या दोघांस जी संतती झाली तिला धाराळ असे ते मानतात. दोही नावाच्या फळांवरही ते उपजीविका करीत असतात. म्हणून त्यांना दोही असेंही एक नाव आहे. हे शरीराने मजबूत असून मितव्ययी आहेत. यांच्यांत कुलीन व अकुलीन असे भेद असून ते आपल्याला सर्व कोळ्यांत श्रेष्ठ मानून इतर कोळ्यांशी रोटीबेटीव्यवहार करीत नाहीत; मात्र रजपुतांशी करितात. यांच्या २२ पोटजाती असून त्यापैकी चुडासाम व जादव आणि सर्वाय या श्रेष्ठ गणल्या जातात. चावडा, चोहान, बारीया, दाभी, जालिया, दलवाडी, गेडिया, शिआल, बलकिआ, खांट, कोतवाल, पागी, अशी यांची शाखांची नावें असतात; पागी व कोतवाल हे पहारेक र्‍याचे काम करतात. हल्ली या धाराळ कोळ्यास तीन वानें असतात; एक रजपूत वेशावरून पडलेले, दुसरे कोळी जातींतील आडनाव व तिसरे स्थानिक नाव असतें. यांच्यातील दाभी व ताक्वान हे वंश फार प्राचीन आहेत. बारीया हे बारीया संस्थान व रेवाकांटा प्रांतांत आहेत. बारिया हेंच त्यांचे मूलस्थान असून मध्यंतरी चोहोन रजपुतांनी त्यांना हुसकावून दिले होते, परंतु महंमूद बेगडय़ाच्यावेळी ते परत इकडे आले. दलवाडी हे खेडा जिल्ह्यांतील रहिवासी असून त्यांचे खरें नाव तलवारी (खोदणारे) असे आहे. हे विहिरी खोदून विटाही पाडतात. गेडिया हे काढेवाडांत राहतात; कच्छ प्रांतांतील गेडी या शहरावरून यांना गेडिया म्हणून लागले. चालीरीती व पेहरावांत हे बर्द येथील मेदांप्रमाणे आहेत. हे मांसाहार करीत नाही. गुजराथेंतील सर्व कोळ्यांत यांची जात श्रेष्ठ समजली जाते. हे फक्त आपापल्या जातींतच लग्ने लावितात. शिआल म्हणून जी जात आहे ती काठेवाडच्या दक्षिण किनार्‍यालगतच्या शिआल बेटांत राहते. वलकिया हे काठेवाडांतील वलक जिल्ह्यांत राहतात. याप्रमाणे गुजराथेंतील बहुतेक कोळ्यांच्या जातींची विशेष माहिती दिली आहे. त्यांची सामान्य माहिती पुढे देत आहोंत:-

यांचा जीवनक्रम निरनिराळा असल्याने व रजपुतांशी कित्येकांचा संबंध येत असल्याने यांच्या चर्येत बराच फरक आढळतो. तलबदांची चर्या व चालीरीती कुणब्यांप्रमाणे सर्वसाधारण आहेत. चुंव्वाळी यांचे शरीरसंबंध उच्च वर्गाशीं झाल्यानें तेही तलबदाप्रमाणे गौरवर्ण आहेत. कोळी राजे हे बहुधा रजपूत पुरुष व कोळी स्त्री यांचे वंशज असून धष्टपुष्ट, चपळ, धूर्त व कारस्थानी असतात. या जातींतीतल बहुतेक स्त्रिया सडपातळ व सुरेख असतात. यांची भाषा अशुद्ध गुजराथी असते. यांचा पेहराव दर्जाप्रमाणे निरनिराळा असतो. दागिन्यांपैकी ताईत हा पुरुष वापरतात व बायका हस्तिदंती बांगडय़ा, सोन्याची नथ, चांदीच्या वेळा वापरतात. सुखवस्तू लोक ज्वारी व बाजरी खातात; कधी कधी खिचडीही खातात. डोंगरांतील कोळी हंगामाप्रमाणे आपला आहार बदलतात. बहुतेक कोळी मद्यमांससेवी आहेत. पाटणावांडिया हे म्हशीचें मांस खाणारे असल्याने त्यासाठी ते म्हशीची चोरीही करितात. कांही कोळी अफीमबाजही आहेत. यांचा धंदा मासेविक्रीचा व शेतीचा आणि कांहींचा लुटालूट करण्याचा आहे. पूर्वी बहुतेक कोळी दर्यावर्दीपणा करीत असत. स्वराज्यांत हे आरमारी खात्यांत नौकर असत. स्वराज्य गेल्यानंतर अंगांतील शौर्यधाडसाचा उपयोग नाइलाजानें चौर्यकर्माच्या ठिकाणी होऊ लागला असावा. यांची मुख्य दैवतें इंद्र व हातमल ही आहेत. शिवाय हिंगलाजदेवी, खोदिआर, कुंकुडी वेराई, मेराडी या त्यांच्या देवता आहेत. महिकाठ्याकडे गाईची पूजा करितात. एकादशी व त्रयोदशीस यांचा सुट्टीचा दिवस असतो. यांचा गुरु पाटण येथे राहतो. कांहीजण बीजकपंथी रामसनेही व स्वामीनारायण पंथाचे झाले आहेत. अलीकडे स्वामीनारायणांत जातिभेदाचें महत्त्व वाढल्यानें कांही कोळ्यांनी तो पंथ सोडला आहे. काठेवाडी कोली मोहोतीमार्गी असून ते द्वारका, प्रभासवाटण वगैरे ठिकाणी यात्रेस जातात. ते ब्राह्मणांना पूज्य मानून त्यांना लुटीत नाहीत. त्यांच्याकडून राखीपौर्णिमेस राखी बांधून घेतात. ते खळ्याजवळ आल्यास त्यांना धान्य देतात. याचे उपाध्याय श्रीमाळी व औदीच ब्राह्मण असतात. हे धर्मभोळे असून भूताखेतांवर व जादुटोण्यांवर आणि पंचाक्षर्‍यावर विश्वास ठेवितात. मूल जन्मल्यावर त्याला गुळाची एक लहान गोळी देऊन सर्वत्रांस गूळ वाटतात. षष्ठीपूजनाच्या दिवशी सटवीबरोबर ब्रह्मदेवाचीही पूजा करून त्याच दिवशी मुलाचें नाव ठेवतात. सुखवस्तू कोळ्यांत सेहेर सव्वा महिना धरतात.

यांच्यात लग्नाचे चार प्रकार आहेत. (१) कुमार व कुंबारीण यांचा प्रथम विवाह. (२) विधुर व विधव यांचें नात्र. (३) सोवासन म्हणजे पहिला नवरा जिवंत असता दुसरा करणे. (४) दिअर्वतु(दीरवधु) म्हणजे धाकटय़ा दिराशी लग्न करणे. रेवाकांठय़ाकडे वाङ्गिनश्चय झाल्यानंतर जोपर्यंत देवीपक्षी उजव्या हाताकडे दिसत नाही तोपर्यंत लग्न लावीत नाहीत. मध्य प्रांतातल्याप्रमाणे इकडेही वराच्या बापास वधूगृही उंबरठय़ावर ठेंच लागणे शुभकारक समजतात. लग्नमंडपांत प्रवेश करण्यापूर्वी वरावरून नांगर, रवी, बाण वगैरे जिन्नस नवरीची आई ओवाळतें. लग्नसमयी नवरीच्या एका हातांत बाण व एका हातांत माळ असते. ठाकूरकोळ्यांत रजपुतांप्रमाणे मुलींचे लग्न प्रथम तलवारीशी लावितात. नात्रलग्नांत नवरदेव विधुर असावा लागतो. ब्रह्मचार्‍यानें विधवेशी लग्न केल्यास तो जातिबहिष्कृत होतो. नात्राचा समारंभ साधा असतो. तो विधवेच्या बापाच्या घरी होतो. वधूवर समोरासमोर बसतात व ब्राह्मण उपाध्याय त्यांचे हात नात्रा-नाडा (तांबडा दोरा)ने बांधून त्यांना मधोमध ठेवलेल्या मडक्यांतील दिव्याकडे पाहण्यास सांगतो, म्हणजे हा समारंभ आटपतो. सोवासन म्हणजे एक पती जिवंत असताना दुसरा करणें; यांत पहिल्या नवर्‍याला पंचायत ठरवील त्याप्रमाणे पैसा द्यावा लागतो. पहिल्या नवर्‍याने काडी मोडून दिल्यावर विधवा आपल्या डोकीवर पाणी भरलेले दोन तांबे उतरून दाराबाहेर ठेवतो, इतके झाले की लग्नविधी संपतो. दिअर्वतुविवाह फार प्रचारांत नाही. त्याला आप्तेष्टांची संमत्ती घ्यावी लागते. विधवेस लहान मुलें असल्यास तिर्‍हाईत पुरुषांशी लग्न लावण्यापेक्षा धाकटय़ा दिराशी लग्न लावणे बरें असे त्यांना वाटतें. मात्र तो दीर तिच्याकडून वयानें मोठा व विधुर असला पाहिजे. पुरुषाप्रमाणें बायकोलाही काडी मोडून देता येते व नवरा सोडता येतो.

गुजराथेंतील कोळी प्रेंते जाळतात. मृताचा पुत्र लहान अगर दरिद्री असल्यास दहाव्या, अकराव्या व बाराव्या दिवशी श्राद्धादि विधी न करितां, तो दाराबाहेर येऊन नुसते हात चोळतो. एक वर्ष होईपर्यंत मृताच्या घरांतील वडील स्त्री, तोंडावर ओढणी घेऊन रोज सकाळी पांच-दहा मिनिटें रडते. जातींतील सर्व भांडणें पंचायत अगर पुढारी तोडतात. (गुजराथी कोळ्यांची सर्व माहिती बॉम्बे ग्याझेटियर व्हॉ. ९ भा. १ यांतून घेतली आहे.)

सोनकोळी:- या जातीबद्दल वेसावे ता. साष्टी जि. ठाणे येथील रहिवासी व सोनकोळी सार्वजनिक परिषदेचे चिटणीस रा. पोशा दोविंद नाखवा यांनी आमच्याकडे जी माहिती पाठविली आहे, तिचा थोडक्यांत सारांश पुढीलप्रमाणे आहे. “या जातीचें मुख्य ठिकाण चंपावती (चेऊल, जि. अलिबाग) हे होय. यांची वस्ती रत्‍नागिरी, कुलाबा, ठाणे व मुंबई बेट या चार भागांतील समुद्रकांठच्या सुमारे दीडशे गांवी आहे. यांचा मुख्य धंदा मासे धरण्याचा. मोटे मासे फक्त दर्यात सापडतात. म्हणून हे दर्याकाठीच राहतात. यांची लो. सं. ३५ हजार आहे. हे लोक जाळ्यांनी मासे धरतात व यांच्या बायका ते मासे ताजे किंवा वाळवून बाजारांत विकतात. यांच्या जाळ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:- डोलं, बोकशी, जाळ, पास, तिबोटें, वागूर, कानजावळें, जावळें, हेडा, पाग, घोळवें, खांदा वगैरे, सोनकोळी नावाबद्दल शिवनिबंध नामक ग्रंथांत पुढील कथा आहे. परमेश्वराच्या सोहंध्वनीपासून एक पुरुष निर्माण झाला, त्याला सोहं अगर सोम किंवा मयातऋषी असे नाव मिळाले. त्याची मुलगी अचिंता ही कश्यपास दिली, तिला मार्धन म्हणून मुलगा झाला. याच्या वंशजास सोम नाव पडलें. त्याची प्रवृत्ती तपापासून सुटून हिंसेकडे होऊ लागल्याने मयातऋषीने त्यास मासे मारून निर्वाह करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो करू लागल्यावर त्याचे सोम नाव जाऊन सोन अगर सोनकोळी हे नाव पडलें. सोनकोळी जात कोणत्या वर्णाची आहे याबद्दल निश्चित सांगता येत नाही. काहींचें म्हणणे हे वैश्य व काहींचें म्हणणे हे शूद्र आहेत.” ही जात मासे मारण्यासारखें हिंसाकर्म करीत असल्याकारणानें प्राचीन काळापासून या लोकांस गायत्री व यज्ञोपवीत यांचा अधिकार राहिला नाही व त्याचे या जातीच्या लोकांकडून आजपर्यंत ग्रहण व धारणही झालेले नाही आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यांत जो पंचमहायज्ञ करण्याचा नित्यक्रम आहे, तोही यांच्यांत नाही, अतएव ही सोनकोळी जात शूद्र वणर्आंत गणिल्यास काय वावगें होणार आहे? रा. राखवा यांची माहिती अशी. “यांची प्रथम वस्ती कुलाबा जिल्ह्यांत होती. नंतर तेथून ते ठाणएं व रत्‍नागिरी जिल्ह्यांत पसरले. ज्यावेळी आंग्रय़ांचे प्राबल्य कोकणांत होते, त्यावेळी त्यांनी कोनकोळ्यांच्या बायकांवर एक ‘जोबनपट्टी’ किंवा ‘चोळीपट्टी’ बसविली. बायकांनी अंगात चोळ्या न घालतां अंगावरून लुगडय़ाचा पदरच घ्यावा व ज्यांना चोळ्या घालावयाच्या असतील त्यांनी काही ठरावीक कर आंग्रे सरकारांत भरावा असा या कराचा अर्थ होता. त्यामुळे बायांचा छळ होऊ लागला. म्हणून कुलाबा जिल्ह्यांतील थळ वगैरे गावांतील वस्ती उठून मुंबई, ठाणें, चिंबई, वेसावें इकडे येऊन राहिली. हे लोक हल्ली आपणास थळकर सोनकोळी म्हणवितात. यांची कुलदैवते जेजुरीचा खंडोबा व कोर्ल्यांच्या लेण्यांतील एकवीरा देवी ही होत. या पंथाचा प्रवर्तक कुलाबा जिल्ह्यांतील मौजे वरसोली गांवचा पूर्वीचा कोणी कान्हो नावाचा भगत होता. हा स्मार्तपंथांतर्गत खंडोबाचा पंथ असून याच्या धर्मगुरूची गादी वरील वरसोली गावी आहे व गादीवर वरील भगताचाच वंशज अधिष्ठित आहे. सोनकोळ्यांकडून भिन्न अशा कोळ्यांच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत:- गांवकर सोनकोळी, वैती, मांगेली, मेंद्री, खारबी, ढोरलेकर, ऱहटाळकर, गावीट, पान, राज, मार्तंड, डोंगरी, भिल्ल, भोईर, कराडे व क्रिस्तांव. या जाती बहुतेक मासळी मारून त्यावर निर्वाह करणार्‍या व थोडय़ा शेती वगैरे दुसरे धंदे करणार्‍या आहेत. क्रिस्ताव हे जरी ख्रिस्ती धर्म पाळतात तरी ते हिंदू धर्मही थोडाफार आचरतात. सोन, गांवकरसोन, वैती व मार्तंड या चौघांत परस्पर अन्नोदकव्यवहार चालतो. मात्र हे चारही इतर कोळ्यांच्या घरी जेवीत नाहीत. लग्नव्यवहाराविषयी म्हटल्यास ज्या जातींतील स्त्री-पुरुषांचा त्याच जातींतील स्त्री-पुरुषांबरोबर विवाह होत असतो. मध्यंतरी सोन व गांवकरसोन यांच्यात लग्ने होत; परंतु हल्ली ही चाल बंद होत चालली आहे. मात्र कुलाब्यातील करंजे मुलुखांड व ठाण्यांकडील साबासें, दिवाळें इकडे ही चाल सुरू आहे.

सोनकोळी जातींत पंचायतीसंघ आहेत. प्रत्येक गावांत एक किंवा अनेक तट अथवा थळें किंवा जमाती असतात. त्या प्रत्येकांस गावपंचायत म्हणतात. कित्येक गाव मिळून एक संघ होतो. सार्वजनिक निवाडे अशा संघांच्या पंचायतींपुढें येऊन निवडले जातात. आणि खासगी निवाडे फक्त गावांतील पंचायतींत चालतात. जे निवाडे गांवपंचायतींत तुटत नाहींत ते कोकणांतील चार भागांची जी सोनकोळी सार्वजनिक परिषद हल्ली स्थापित झाली आहे तिच्यापुढे जातात. या परिषदेचे ठिकाण वेसावें येथे असून तिच्या कायर्यकारी मंडळांत (१९१९) रा. अ. बा. शिंदे हे अध्यक्ष, रा. क. श्रा. पाटील हे उपाध्यक्ष व रा. पो. गो. नाखवा हे चिटणीस होते. प्रत्येक जमातीच्या मुख्यास पाटील म्हणतात. गावच्या लोकवस्तीच्या मानाप्रमाणें तट एक किंवा अनेक असून त्याप्रमाणे पाटीलही असतात. पाटलाचा अधिकार वंशपरंपरेचा असतो. पाटील घराण्यांत कोणीच पुरुश हयात राहिला नाही तर पाटीलकीचा अधिकार घराण्यांतील मुख्य व वडील बाईकडे देण्यात येतो व तिच्या नावानें तटांतील कर्ते गृहस्थ तटाचा कारभार चालवितात. एखाद्या घराण्याचा निर्वंश झाल्यास तटांतील कर्ते पुरुष आपल्या संगनमतानें आपल्याच पैकी एखादा सर्वमान्य कर्ता पुरुष अधिकारी नेमून त्याला ‘अमुक मयत पाटलाचा कारभारी’ असे म्हणतात. हा अधिकार वंशपरंपरेचा नसून तो लोकसमाधानावर अवलंबून असतो. वादाचा निकाल बहुमतानें देण्यात येतो. पंचायतीपुढे नित्य व नैमित्तिक प्रश्नांचे वाद येतात; नित्य म्हणजे- शिव्यागाळी, मारामारी वगैरे व नैमित्तिक म्हणजे- जातीजातींत सुधारणा, शिक्षणप्रसार वगैरे. अपराध्यास बहुमताप्रमाणे शासन करण्यात येते. ते शासन गुह्याच्या सौम्य व तीव्र स्वरूपाप्रमाणे थोडेफार दंड करणे असे असते. दंड न दिल्यास त्याला वाळीत टाकतात. शासनाच्या या दोन प्रकारांखेरीज तिसरा प्रकार सोनकोळी जातीच्या पंचायतींत रूढ नाही. प्रत्येक फिर्यादीमागे वादीप्रतिवादीकडून सव्वा रु. घेऊन त्यांतील चार आणे पाटलांस वतन म्हणून व बाकीचे सव्वादोन रु. पंचायतींत हजर असणार्‍या इसमांस वांटण्यांत येतात. शिवाय प्रत्येक लग्नांत वरपक्षाकडून पाटलास सव्वा रु. बिदागी मिळते. गुन्हेगारास शासन करण्याची रीत जातींत पूर्वापार चालत आलेली आहे. या अधिकारासाठी ब्रिटिशसरकारकडून मंजुरी मिळालेली नाहीं. तथापि ब्रिटिश अंमलापूर्वी अशी मंजुरी सोनकोळ जातींतींल दोन सरपाटील घराण्यांना मोंगल बादशहाकडून मिळालेली असून, तिजप्रमाणें अंमल सदरहु सरपाटील घराणी आजपर्यंत चालवीत आहेत. यांचा अंमल चेऊलच्या व जंजिर्‍याच्या आसपासच्या प्रांतांवर आहे. यांच मूळपुरुष जानू पटवारी ऊर्फ जाया पाटील होता व त्यास दिल्लीकर व विजापुरकर शहांनीं हा अधिकार दिला होता. खटल्यांच्या निवाड्यांचीं टिपणें पूर्वी लिहून ठेवीत नसत. हल्लीं सोनकोळी ज्ञातिपरिषदेच्या दप्‍तरांत निवाडे लिहून ठेवण्यांत येतात. प्रत्येक पंचायतीला थोडीफार स्थावर स्वरूपाचीं (देवळें, घरें, जमीन, वगैरे) मालमत्ता व नक्त ऐवजहि असतो. या मिळकतीवर त्या पंचायतीची सत्ता असते. पंचायतीच्या खर्चासाठी प्रत्येक घरापासून दरवर्षी कांहीं रक्कम घेतात. या जमातीच्या करावर तटाच्या लोकांचा हक्क असून तो तटाच्या तिजोरींत जमा होतो. या जातीचे उपाध्यक्ष गोवर्धन, क्रमवंत, पळशे, देशस्थ व चित्पावन ब्राह्मण असून त्यांच्याचकडून विवाहादि धार्मिक संस्कार करतात व रीतीभाती आणि गोतासंबंधीचें व्यावहारिक प्रश्न जात आपल्या मतानें सोडविते. हल्लीं यांच्यापैकीं शिकलेल्यांना पोशाख पांढरपेशांसारखा असतो. मुलें व मुली मराठी शिक्षण घेऊं लागल्या असून क्वचित मुलें इंग्रजीहि शिकूं लागलीं आहेत. मुंबई बेटांत रहाणार्‍या पैकीं १/४ लोक मासळी मारण्याचा धंदा करीत असून ३/४ लोक सरकारी व्यापारी नौकरी व धंदे करू लागले आहेत. विधवेचा विधुराबरोबरच पुनर्विवाह होतो.
Sविधवा स्वत:च मासळी विक्रीचा धंदा करीत असल्यानें तिचा भार कोणावर पडत नाहीं. अनाथ मुलांच काळजी त्यांचे  नातलग घेतात. स्वजातीय अगर परजातीय राख ठेवण्यास निर्बंध आहे. तो मोडणार्‍यास राखेचा त्याग करवून विधियुक्त पावन करून घेतात. हाच न्याय स्त्रियांस लागू आहे. स्त्रियांस अधर्मव्यवहारानें सजातीय पुरुषांपासून झालेल्या संततीस स्वजातींतच मिळवून घेत असतात."  (रा. पो. गो. नाखवा यांची लिहून आलेली माहिती). महाभारतांत कोळगिरीपर्वत दक्षिणेंत असल्याचा (सहदेव दिग्विजय), कोळिसर्प नांवाचे लोक शूद्रवर्गांत घातल्याचा (अनुशासन पर्व) आणि कोलवगिरेय लोकांनां अर्जुनानें अश्वमेधयज्ञाच्या दिग्विजयांत हांकलून लावल्याचा असे तीन उल्लेख आले आहेत. [सेन्सस रिपोर्ट १९११. व्हॉ. २०; कास्टस् अँड ट्राइब्ज. सी. पी.; रसेल, हिरालाल; बाँबे ग्याझे. व्हॉ. ९ भा. १]
See next thank you

No comments:

Post a Comment